पिण्याच्या पाण्याच्या टाक्या धुणे आणि स्त्रोतांचे क्लोरीनेशन मोहिम
पुणे
जिल्हयातील इंदापुर तालुक्यात आरोग्य विभाग आणि पाणी पुरवठा विभागाकडून
नुकतेच पिण्याच्या टाक्या धुणे आणि स्त्रोतांचे क्लोरीनेशन मोहिम
घेणेत आली. अतिशय चांगल्या प्रकारे झालेल्या अंमलबजावणीला माध्यमांनी
सुद्धा प्रसिद्धी दिली. सर्व जिल्हयात आज
या प्रकारे काम करणे सुरू आहे. यामध्ये आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेवक,
पाणी पुरवठा जलसुरक्षक, ग्रामसेवक, शाखा अभियंता आणि जिल्हा पाणी
गुणवत्ता टिम यांनी सहभाग दिला. असो प्रत्येकाने या प्रकारे आपले योगदान
देणे गरजेचे आहे. पावसाळा येण्यापुर्वी चला सर्वजणच तयारीला लागू....
शुद्ध पाणी..... उत्तम आरोग्य...
जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष
जिल्हा परिषद पुणे
जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष
जिल्हा परिषद पुणे
स्त्रोत सांकेतांकबाबत माहिती
छायाचित्र
पाणी गुणवत्ता
जलीय प्रदूषकांचे प्रकार : नैसर्गिक पाणी हे अनेक प्रकारच्या सजीवांचे वसतिस्थान आहे. ते एक सर्वकामी विद्रावक आहे म्हणजे अनेक रसायने त्यात विरघळू शकतात. औद्योगिक क्षेत्रांतून बाहेर येणाऱ्या, तसेच घरगुती कामांसाठी वापरलेल्या पाण्यात अनेक पदार्थांचे कण व अनेक प्रकारचे व्हायरस आणि जीवजंतू मिसळले जातात. सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, अमोनियम, मॅग्नेशियम, क्लोराइड, नायट्राइट, बायकार्बोनेट, सल्फेट आणि फॉस्फेट यांसारखे अकार्बनी पदार्थ आणि अगणित प्रकारचे कार्बनी पदार्थ वापरलेल्या पाण्यात आढळतात. यांशिवाय अनेक कीटकनाशके, प्रक्षालके (डिटर्जंट्स), फिनॉलापासून तयार केलेली रसायने, कार्बॉक्सिलिक अम्ले यांसारखे विविध प्रकारचे कार्बनी पदार्थही त्या पाण्याबरोबर वाहत असतात. ह्या पदार्थांमुळे पाण्याची चव बिघडते. अशा पाण्यापासून निरनिराळे रोग उद्भवतात; वनस्पतींचा व जलीय जीवांचा संहार होतो; आसमंतातील सौदर्य नष्ट होते; सर्वत्र घाणीचा व कुबट वासाचा उपद्रव होतो. काही प्रकारच्या जलीय वनस्पती मात्र अशा प्रदूषिक परिसरात खूप जोराने वाढतात, संपूर्ण जलपृष्ठ आच्छादितात व शेवटी नाश पावतात. अशा जलाशयातील पाणी शेती, उद्योगधंदे, नौकाविहार व इतर मनोरंजन, जलचर व भूचर जीवांचे संवर्धन या दृष्टीने पूर्णतया निरुपयोगी असते. साधारणपणे पाण्यातील प्रदूषकांचे पुढीलप्रमाणे वर्गीकरण केले जाते.
(१) मानवी मलमूत्र व औद्योगिक
कार्बनी अपशिष्टे : साधारणपणे शहरवासीयांनी
उत्सर्जित केलेले मलमूत्र आणि औद्योगिक अपशिष्टांतील कार्बनी पदार्थ
मलवाहिन्यांतून नेऊन नद्यांत, समुद्रात
किंवा दूरच्या जलाशयात टाकून देण्यात येतात. ह्या जलाशयात राहणाऱ्या सूक्ष्मजंतूंना मलवाहिन्यांतून येणाऱ्या कार्बनी पदार्थांतून खाद्य मिळते, त्यांच्याकरवी ऑक्सिडीकरणाची क्रिया [⟶ ऑक्सिडीभवन]. चालू राहते व पाणी हळूहळू शुद्ध होऊ लागते; पण हे शुध्दीकरण मर्यादित स्वरूपाचे असते. पाण्यात जर अतीव प्रमाणात कार्बनी
पदार्थ असले, तर सूक्ष्मजंतूंची जीवरासायनिक ऑक्सिजनाची
मागणी वाढते व पाण्यातून उपलब्ध होणाऱ्या ऑक्सिजनाचे एकंदर प्रमाण घटते. त्यामुळे
परिसरातील नेहमीचे परिस्थितिवैज्ञानिक संतुलन बिघडते व प्रदूषणाची समस्या निर्माण
होते. संस्कारित अन्न, कागद व माल्ट तयार करणाऱ्या कारखान्यांतून आणि
ऊर्ध्वपातन प्रक्रियेने (द्रव घटकांचे मिश्रण तापवून तयार होणारे बाष्प पुन्हा थंड
करून मिश्रणातील घटक अलग करण्याच्या प्रक्रियेने) विविध रसायने तयार करणाऱ्या
कारखान्यांतून अनेक कार्बनी अपशिष्टे पाण्यात फेकली जातात. तीही पाण्यातील
जीवरासायनिक ऑक्सिजन शोषून घेतात व प्रदूषण तीव्रतर करतात.
(२) सांसर्गिक रोगमूलक सूक्ष्मजंतू : शहरांतील सांडपाणी व मैला घेऊन जाणाऱ्या मलवाहिन्यांत अनेक प्रकारच्या
रोगांचे जीवजंतू व व्हायरस शिरत असतात. मलवाहिन्यांतील परिस्थितीत हे रोगमूलक
जीवजंतू दीर्घ कालपर्यंत तग धरू शकत नाहीत. समुद्रात सोडण्यापूर्वी त्या पाण्यावर
काही संस्कार केल्यास जंतूंच्या बहुतेक जाती नामशेष होतात. ज्या काही रोगांचे
जीवजंतू शिल्लक राहतात त्यांच्यावर विशेष जंतुनाशक प्रक्रिया केल्या, तर तेही नष्ट होतात. हे संस्कारित पाणी पिण्याच्या पाण्याच्या साठ्यांपासून
दूरच ठेवण्यात येते. पिण्यासाठी पुरविण्यात येणाऱ्या पाण्याची अधूनमधून वैद्यकीय
परीक्षा किंवा तपासणी करणे आवश्यक असते.
मैलापाण्याची नीट सोय न झाल्या कारणाने दूषित झालेल्या पाण्यामुळे जठरांत्रशोथ, बृहदांत्रशोथ (मोठ्या आतड्याचा शोथ) व आंत्रशोथ (आतड्याचा-मुख्यत्वे लहान
आतड्याचा-शोथ) यांसारख्या व्याधी संभवतात. १०० मिलि. पाण्यात अशा रोगकारक जंतूंची
संख्या दहापेक्षा अधिक असता कामा नये. यांशिवाय पाण्यात अनेक प्रकारच्या रोगांना
कारणीभूत होणारे व्हायरस असतात. त्यांचे अस्तित्व चटकन हुडकून काढण्याच्या
वैद्यकीय पद्धती व त्यांची सुरक्षा संख्यामर्यादा निश्चित करणारी यंत्रे पदोपदी
अंमलात आणली पाहिजेत.
(३) वनस्पतिपोषक द्रव्ये : नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम व तत्सदृश जीवनावश्यक मूलद्रव्ये परिस्थितिवैज्ञानिक आवर्तन पूर्ण
करण्यासाठी जमिनीत परत येत नाहीत. ती विविध प्रकारच्या जलप्रवाहांना मिळून
अपशिष्टांच्या स्वरूपात वाहात जातात व शेवटी महासागरांत जाऊन पडतात. धान्य काढून
घेतल्यानंतर उर्वरित निरुपयोगी वनस्पतींची इतर प्रकारच्या कचऱ्याप्रमाणे विल्हेवाट
लावण्यात येते. त्यामुळे कृषिक्षेत्रात वनस्पतींचे पोषण करणाऱ्या द्रव्यांचा
मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक रीत्या सातत्याने अपव्यय होत असतो. पोषक द्रव्यांची ही
तूट भरून काढण्यासाठी तितक्याच मोठ्या प्रमाणावर रासायनिक खतांचा उपयोग करावा
लागतो. पुढे कधी काळी ती प्रदूषके ठरतील, याची ती खते वापरताना कल्पना नसते. केवळ विपुल प्रमाणात अन्नधान्याची निर्मिती
व्हावी हाच हेतू रासायनिक खतांच्या वापरात मुख्यत्वेकरून अभिप्रेत असतो. जोराचा
पाऊस पडला की, ओहोळ व तात्पुरते जलप्रवाह निमार्ण होतात; ते नद्यांना मिळतात व नद्या समुद्रांना मिळतात. त्यांच्या बरोबर पर्यायाने
जमीनीवर टाकलेल्या रासायनिक खतांतील बरीचशी द्रव्ये वाहून नेली जाऊन बहुतेक सर्व
जलावरण प्रदूषित होते. जमिनीवर पडलेले पाणी पाझरून भूमि-अंतर्गत जलाशयाच्या
साठ्यापर्यंत पोहोचते. त्या पाण्याबरोबर रासायनिक खतांतील मूलद्रव्ये
भूमिजलापर्यंत पोहोचतात व ते पाणी दूषित करतात. अशा प्रकारांमुळे दूषित झालेले
पाणी सरोवरांमध्ये किंवा नद्यांमध्ये शिरल्यास जलाशयात ⇨ शैवले जोमाने वाढू लागतात. शैवले साधारण प्रमाणात वाढल्यास त्यांच्यापासून माशांना
अन्न मिळते. ह्या शैवलांमुळे पाण्यातील ऑक्सिजनाचे संतुलनही साधले जाते; पण त्यांना जर कृषिकार्यासाठी जमिनीवर विखुरलेल्या रासायनिक खतांतील नायट्रोजन
व फॉस्फरस यांचे उर्वरित भाग पोशणासाठी उपलब्ध झाले, तर शैवलांच्या विविध जाती अती त्वरेने वाढू लागतात व गर्दी करून त्या इतर
वनस्पतींचा विस्तार खुंटवितात, तसेच जलाशयातील माशांच्या जीवितालाही धोका निर्माण करतात. कालांतराने जर
त्यांना पाण्यातून पोषक द्रव्ये इष्ठ प्रमाणात मिळाली नाहीत, तर त्यांचा तितक्याच त्वरेने संहार होतो. ही मृत शैवले कुजू लागतात व अनेक
प्रकारचे सूक्ष्मजंतू निर्माण होतात आणि ते पाण्यातील ऑक्सिजन शोषून घेतात. या कुजणाऱ्या शैवलांमुळे सर्वत्र घाण व दुर्गंधी पसरते.
(४) कार्बनी पीडकनाशके : मानवी परिसरात वाढणारे विविध प्रकारचे कीटक, उपद्रवी किडे व जंतू आणि काही जातींचे तण व अपायकारक वनस्पती यांच्या
अडथळ्यामुळे मानव जातीच्या अनेक विकासयोजना रोखून धरल्या जातात. काही जंतूंमुळे
रोगराई पसरते; उपयुक्त पाळीव जनावरे मृत्यूमुखी पडतात, कृषिकार्यात व्यत्यय येतो व अन्नधान्याचे उत्पादन घटते. अलीकडे अनेक कीटनाशक, कवकनाशक, तणनाशक इं. पीडकनाशक रसायनांचा शोध लागला आहे [⟶ पीडकनशके]. त्यांच्या
साहाय्याने रोगकारक जंतूंचा व कीटकांचा आणि निरूपयोगी व उपद्रवी तणांचा विनाश करायचा मानवाने सपाटाच आरंभिला आहे. त्यामुळे
कृषिकार्यात आशचर्यकारक प्रगती घडून आली व
अन्नधान्यनिर्मिती प्रमाणाबाहेर वाढली. आता कृषिकार्याच्या बहुतेक सर्व अवस्थांत व
शाखांत पीडकनाशकांचा सर्रास उपयोग केला जात आहे. एकाहून एक प्रभावी अशी नवनवीन
पीडकनाशक द्रव्ये, त्यांच्या अपशिष्ठांविषयी व त्यांच्या विषारीपणाविषयी विशेष माहिती नसताना, वापरात आणली जात आहेत. त्यांचा अल्पांश कधीकधी पिण्याच्या पाण्यात शिरल्यास
जलीय प्रदूषणाचा धोका निर्माण होतो. हे टाळण्यासाठी निरनिराळ्या मार्गांनी व
निरनिराळ्या ठिकाणांहून मिळविलेले पाणी शहरवासीयांना पुरविण्यापूर्वी वेळोवेळी
त्याचे आरोग्यदृष्ट्या परीक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे.
(५) त्याज्य खनिज द्रव्ये व रसायने : कारखान्यातून निघालेली अपशिष्टे विशिष्ट संस्कारांनी निर्धोक न करता तशीच सरोवरांत किंवा नदीनाल्यांत जाऊ दिली, तर जलीय प्रदूषणाच्या अनेक गंभीर समस्या निर्माण होतात. कॅल्शियम व मॅग्नेशियम
यांची लवणे पाण्यात विरघळल्यास ते पाणी कठीण (साबणाचा फेस ज्यात होऊ शकत नाही असे, अफेनद) होते. औद्योगिक कार्यासाठी व पिण्यासाठी अशा पाण्याचा विशेष उपयोग होऊ
शकत नाही. ह्याच पाण्यात जर औद्योगिक अपशिष्ठांतील काही विषारी रसायने मिसळली गेली, तर त्या जलप्रवाहांच्या नित्याच्या जैविक क्रियाशीलतेत, बदल घडून येतात. काही रसायनांच्या प्रभावाने ते पाणी अम्लीय किंवा क्षारीय
(म्हणजे अम्लाशी विक्रिया केल्यास लवण देण्याचा गुणधर्म असलेले) होते. हा गुणधर्म
प्रमाणाबाहेर वाढल्यास तेच पाणी क्षरणकारी (झीजवून नाश करणारे) होते; त्यातील सजीव सृष्टीचा नाश होतो. काही विशिष्ट रासायनिक द्रव्यांमुळे
पाण्यातील ऑक्सिजनाचे प्रमाण घटते. साधारण पणे औद्योगिक प्रकल्पातून आर्सेनिक, बेरियम, क्रोमियम, काही सायनाइडे, शिसे, पारा, काही फिनॉलांच्या जातींची रसायने बाहेर येऊन
पाण्यात मिसळतात. पिण्याच्या पाण्यातील त्यांची संहती (प्रमाण) विशिष्ट
मर्यादेपर्यंतच (उदा., आर्सेनिकच्या बाबतीत प्रती लिटर ०.०५ मिग्रॅ.पर्यंत) सह्य राहू शकते. या संहतीचे वारंवार परीक्षण करावे लागते व
ती सह्य मर्यादांपलीकडे जाऊ न देण्याबद्दल दक्षता ध्यावी लागते.
(६) सांडपाण्यातील व पाणलोटातील गाळ : औद्योगिक क्षेत्रांतून किंवा शहरांतून येणाऱ्या त्याज्य पाण्यातील
अवसादामुळे वा गाळामुळे सरोवरातील व नद्यातील पाण्याला गढूळपणा येतो व त्यामुळे
जलपृष्ठाचे स्वरूप बदलते. किनाऱ्याजवळील भागात अशी गाळाचे थरांवर थर जमा होतात.
लहान व उथळ पाट, चर किंवा खाडया गाळाने भरून जातात. कधीकधी
जलप्रवाहात मध्येच धरणासारखी गाळाची भिंत निमार्ण होते आणि सांडपाणी व मैलापाणी
कोंडले जाते. अवसादनक्रियेमुळे (साचण्यामुळे) चिकट गाळ (साखा) खाली बसू लागतो. ह्याच
पाण्यात अनॉक्सिजीवी (अंशत वा
पूर्णपणे ऑक्सिजन प्रदूषण विरहित असलेल्या परिस्थितीत जगू शकणारे) जंतू निर्माण
होतात. त्यांच्याकडून या साख्याचे अंशत अपघटन (घटक अलग होण्याची क्रिया) होते. त्यासाठी पाण्यातील ऑक्सिजन मोठ्या
प्रमाणात खर्ची पडतो व हवेतील कार्बन डाय-ऑक्साइडाचे प्रमाण वाढते. अनॉक्सिजीवी
जंतूंमुळे हायड्रोजन सल्फाइड वायू पाण्यात मिसळला जातो. ह्या घटनांमुळे सर्वत्र
दुर्गंधी पसरते.
जगातील अनेक मोठी शहरे समुद्रकिनारी वसली आहेत.
त्यांतील गटारे व मलप्रवाह किनाऱ्यालगतच्या सागरी पाण्यात सोडल्यामुळे निर्माण
होणाऱ्या प्रदूषणाबरोबर इतर अनेक समस्या उद्भवतात. गटारांबरोबर विषमज्वर, प्रलापक सन्निपात (टायफस) ज्वर, जठरांत्रशोथ, यकृतशोथ यांसारख्या रोगांचे जंतू किनाऱ्याजवळील
पाण्यात जातात. तेथून ते माशांच्या पोटात जाऊन पर्यायाने हे दूषित झालेले मासे
खाणाऱ्या मानवांना व मानवेतर प्राण्यांना ग्रस्त करतात. अशा पाण्यात पोहणे, सूर मारणे किंवा फळ्यांच्या साहाय्याने समुद्रपृष्ठावर घसरत जाणे धोक्याचे
असते. समुद्रकिनाऱ्यावर वसलेल्या शहरांतील बरीचशी विषारी घाण मलकुंडातून भूमिगत
मार्गांनी पाझरून किनाऱ्यालगतच्या सागरी पाण्यात मिसळते.
त्यामुळे प्राण्यांनी विसर्जित केलेल्या घाणीवर, ती समुद्रात टाकण्यापूर्वी निर्धोक करण्यासाठी काही संस्करण करणे आवश्यक ठरते.
तथापि अशा संस्करणानंतरही बरीच पोषण द्रव्ये पाण्यात शिल्लक राहतातच. अशा प्रकारे
समुद्रकिनाऱ्याजवळील पाण्याला आवश्यकतेपेक्षा अधिक प्रमाणावर पोषण द्रव्ये मिळतात.
त्यांवर शैवले व इतर जीव जोमाने व प्रमाणाबाहेर वाढतात. ह्या अभिक्रियेला सुपोषणक्रिया म्हणतात; पण तीमुळे परिणामी सागरी पाण्याची उपयुक्त उत्पादनक्षमता बरीच कमी होते.
किनारपट्टीजवळील प्रदूषित पाणी साधारणपणे काळवटलेले असते. त्यातून सूर्यप्रकाशाचे
किरण खूप खोलवर जाऊ शकत नाहीत. त्यामुळे जलपृष्ठाखालील वनस्पतींची
प्रकाशसंश्लेशणात्मक क्रिया [⟶ प्रकाशसंश्लेशण] मंदावते, वनस्पतींचा नाश होऊ लागतो, पाण्यात
विरघळलेल्या ऑक्सिजनाचे प्रमाण कमी होते आणि मृत वनस्पती कुजतात. अतिप्रदूषित
पाण्यात सागरी सूक्ष्मजंतू मोठ्या संख्येने वाढतात. तेही पाण्यातील ऑक्सिजन संपवून
कार्बन डाय-ऑक्साइडाची वृद्धी करतात. ह्या जंतूंमुळे अनेक
प्रकारचे रोग उद्भवून पाण्यातील खाण्यास योग्य अशा माशांचा, कवचधारी जीवांचा व पाणकोंबडयांचा विनाश घडून येतो व जेलीफिशसारखे प्राणी आणि
इतर उपद्रवी जंतू जोमाने वाढू लागतात. ह्या दृष्टीने शेवटी समुद्रात जाणाऱ्या
गटारांतून किंवा मलप्रवाहांतून उपद्रवी जीवजंतूस पोषक असे अन्न किंवा खनिज पोषक
अन्न किनाऱ्याजवळील पाण्यात प्रवेश करणार नाही, अशी दक्षता घेणे आवश्यक असते.
जमिनीवर महावृष्टी झाल्यास पूर येतात आणि बरेचसे पाणी पाण लोटाबरोबर समुद्राला मिळते. त्या
पाण्यात डीडीटी, एंड्रीन, पॅराथिऑन, हेप्टक्लोर इत्यादींसारखी कीटकनाशके मिसळलेली
असल्यास ती समुद्रांतील उपयुक्त जातींच्या माशांचा नाश करतात. समुद्रकिनाऱ्यावर
उभारलेल्या औद्योगिक प्रकल्पांतून अनेक धातू, अम्ले आणि आरोग्यविघातक वायू बाहेर पडतात. कागद आणि लगदा तयार करणाऱ्या
कारखान्यांतून अनेक त्याज्य विषारी पदार्थ बाहेर येतात. इतर औद्योगिक
कारखान्यांतून बाहेर पडणाऱ्या अपशिष्टांबरोबर शिसे, तांबे, जस्त, निकेल, पारा, कॅडमियम, कोबाल्ट यांसारख्या धातूंचे कण व लवणे आणि
सायनाइड, सल्फाइड, अमोनिया, क्लोरीन, ल्युओरीन यांसारखे विशाक्त रासायनिक पदार्थही उत्सर्जित होतात. परिणामी हे
सर्व पदार्थ किनारपट्टीलगतच्या समुद्राच्या पाण्यात प्रवेश करतात व उपयुक्त सागरी
जीवसृष्टीच्या अस्तित्वाला धोका निर्माण करतात.
(७) किरणोत्सर्गी पदार्थ : जगात अनेक ठिकाणी अनेक प्रकारचे किरणोत्सर्गी समस्थानिक नैसर्गिक अवस्थेत
आढळतात. विपुल प्रमाणात ते कोठेही उपलब्ध होत नाहीत. तथापि आतापर्यंत अनेक
अणुकेंद्रीय विक्रियांचा सूक्ष्म अभ्यास केला गेला असून त्यांचे नियंत्रण आणि
उपयोग करण्याचे मार्गही शोधले गेले आहेत. त्यांच्या साहाय्याने आता विविध प्रकारची
किरणोत्सर्गी मूलद्रव्ये त्यांच्या नैसर्गिक स्वरूपांत हव्या त्या प्रमाणात तयार
करता येतात इतकेच नव्हे, तर विविध अणुकेंद्रीय विक्रियांनी त्या
किरणोत्सर्गी मूलद्रव्यांचे अनेक समस्थानिकही बनवून ते ऊर्जानिर्मितीसाठी, तसेच वैद्यक, कृशी इ. विविध क्षेत्रांत उपयुक्त कार्यांसाठी
वापरणे आता शक्य झाले आहे [⟶ अणुकेंद्रीय अभियांत्रिकी; अणुऊर्जेचे
शांततामय उपयोग]. तथापि
किरणोत्सर्गी अणूंचे भंजन करून अणुकेंद्रीय विक्रियांनी ऊर्जानिर्मिती
केल्यास भंजन क्रियेनंतर जी किरणोत्सर्गी द्रव्ये निर्माण होतात, त्यांचे वस्तुमान पुष्कळच अधिक असते. अनेक कार्यांसाठी ती उपयोगात आणली गेली, तरी त्यांचा बराचसा भाग शिल्लक राहतोच आणि ह्या किरणोत्सर्गी अपशिष्ठांची
विल्हेवाट कशी लावावयाची, ही समस्या उद्भवते. ह्या त्याज्य पदार्थांतून
आयनीकारक प्रारण बाहेर पडते. त्यामुळे कर्करोग उद्भवतो, मूलभूत जैव प्रक्रियांत विघाड उत्पन्न होतो आणि सजीवांच्या विविध जातींत जननिक (आनुवंशिक वैशिष्ट्यात) बदल घडून येतात (आयनीकारक
प्रारणांचे द्रव्य पदार्थांवर व जीवसृष्टीवर होणाऱ्या परिणामासंबंधी अनुक्रमे 'प्रारण' व 'प्रारण जीवविज्ञान' या नोंदींत अधिक वर्णन दिले आहे). अणुऊर्जा
प्रकल्पातून बाहेर निघणाऱ्या घन, द्रव
किंवा वायुरूप किरणोत्सर्गी अपशिष्टांची पूर्णतया वेगळ्या अशा दोन
मार्गांनी विल्हेवाट लावण्यात येते. पहिल्या पद्धतीत ही अपशिष्टे संहत करून विशिष्ट जागी बंदिस्त करून ठेवतात. दुसऱ्या पद्धतीत ही अपशिष्टे जलप्रवाहाच्या मदतीने विरल करून त्यांचे कालपरत्वे विकिरण
करण्यात येते (विखुरण्यात येतात). दोन्ही पद्धतींत अंतिम दृष्टीने धोका अभिप्रेत व अटळ आहेच. अपशिष्ठांचे विरलीकरण व विकिरण
केल्यामुळे कालांतराने कणांचा किरणोत्सर्गी क्षय होतो; परंतु ह्या प्रक्रियेला दीर्घ कालावधी
लागतो. कणांचा किरणोत्सर्गी क्षय पूर्ण होण्यापूर्वीच अधिकाधिक अपशिष्टांची भर पाण्यात पडते व जलप्रवाह किंवा समुद्राचे पाणी उत्तरोत्तर प्रदूषित होत
जाते. ह्या कारणामुळे किरणोत्सर्गी अपशिष्टांची विल्हेवाट लावण्याची पहिली पद्धत (संहतीकरण व बंदिस्तीकरण)
अधिक खर्चाची असली, तरी अवलंबितात. सध्या अनेक राष्टांत अनेक ठिकाणी विद्युत् निर्मितीसाठी अणुऊर्जा निर्माण करणारे प्रकल्प योजिले
जात आहेत. त्यांतून निघाणाऱ्या अपशिष्टांचे प्रमाण एकसारखे वाढतच आहे.
अणुकेंद्रीय इंधन प्रथम वापरल्यानंतर निर्माण झालेल्या घटकांवर पुन्हा प्रक्रिया
करतात. त्यांतून जी द्रवरूप अपशिष्टे किंवा उपपदार्थ शिल्लक राहतात त्यांचीही
किरणोत्सर्गक्षमता बरीच असते. ही अपशिष्टे सरळ समुद्रात फेकून देणे अत्यंत धोक्याचे
असते. काही ठिकाणी द्रवरूप पदार्थांचे घनीभवन करून त्यांचे अंतिम आकारमान
साधारणपणे दहा पटीने कमी करणारी साधने वापरली जात आहेत. ही घनीभूत झालेली अपशिष्टे
एकत्र करून जाड मजबूत धातवीय दंडगोलंत (अथवा जाड काँक्रीटच्या अच्छादनात) खच्चून
भरून ते दंडगोल खोल समुद्रात लोटून देतात किंचा मिठाच्या खाणीतील खोल जागेत पुरून
ठेवतात. तथापि यापेक्षा अधिक सुरक्षित जागी ठेवल्याशिवाय अशा. आयनीकारक
अपशिष्ठांची विल्हेवाट पूर्णपणे लावता येणार नाही या अपशिष्ठांचा अर्धायु:काल
(किरणोत्सर्गी द्रव्याची मूळ क्रियाशीलता निम्मी होण्यास लागणारा काळ) दीर्घ
असल्यामुळे अशा बंदिस्त स्थितीत ती किती वरषे सुरक्षित राहू शकतील, हाही एक प्रश्नच आहे. किरणोत्सर्गी अपशिष्ठांची विल्हेवाट लावण्याच्या इतरही विविध योजना
(उदा., कृत्रिम खडकात अशी समाधानकारक योजना अद्याप
प्रत्यक्ष कार्यवाहीत आलेली नाही.
(८) उष्णता : जलीय प्रदूषणात्मक अनेक घटकांपैकी उष्णता हा महत्त्वाचा घटक ठरू शकतो.
सागरी पाण्याचे निर्लवणीकरण करणारी संयंत्रे, औष्णिक विद्युत् निर्मिती केंद्रे, विविध रसायने निर्माण करणारे कारखाने, पोलाद तयार करणारे कारखाने व विद्युत् निर्मितीसाठी वापरण्यात येणारे
अणुकेंद्रीय विक्रियक यांसारख्या प्रकल्पांना मोठ्या प्रमाणात पाणी आवश्यक असते.
अशा करखान्यांतून वा प्रकल्पांतून जे पाणी बाहेर पडते ते अनेकदा बरेच (सागरी
पाण्यापेक्षा १२० ते १८० से. अधिक) उष्ण असते. हे उष्ण पाणी
तलावांत, नद्यांत व समुद्रात गेले, तर 'ऊष्मीय प्रदूषण' निर्माण होते. उष्ण पाण्यामुळे तेथील परिसरातील विद्यमान परिस्थितिवैज्ञानिक
संतुलन बिघडते. जीवनोपयोगी माशांचा मोठ्या प्रमाणावर संहार होतो. शैवलांसारख्या
वनस्पती जोराने वाढू लागतात व त्याबरोबच पाण्यातील
ऑक्सिजनाचे साठे संपुष्ठात येतात. आधुनिक औद्योगिकीकरणामुळे ऊर्जेचा वापर
प्रतिवर्षी ३.५% अशा चक्रवाढ पद्धतीने वाढत आहे. प्रत्येक २० वार्षांनी हा ऊर्जा-व्यय दुपटीने वाढत आहे. ह्याच प्रमाणात ऊष्मीय प्रदूषणाची
समस्याही तीव्रतर होणार आहे. अमेरिकेसारखा अतिप्रगत देशात ऊर्जा-व्यय प्रत्येक १२
वर्षांनी दुप्पट होत आहे. औद्योगिक क्षेत्रांतून निघणारे उष्ण पाणी प्रथम थंड करून
नंतरच समुद्राकडे किंवा इतर जलाशयांत वळवावे आणि कोणत्याही परिस्थितीत जलाशयांतील
किंवा समुद्राच्या पाण्याचे तापमान २० से. पेक्षा अधिक वाढणार नाही अशी खबरदारी
घ्यावी, असे आदेश अमेरिकेच्या शासनाने संबंधित
कारखानदारांना दिलेले आहेत. इतर देशांतील कारखानदारांनीही अशा
नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
(९) फ्ल्युओराइडे : मानवी वसाहतींना पुरविलेल्या पिण्याच्या पाण्यात
विशिष्ट प्रमाणात ल्युओराइडे असणे आवश्यक समजले जाते. पाण्यात फ्ल्युओराइडे योग्य
प्रमाणात असल्यास दातांचा क्षय होण्यास प्रतिरोध होतो व दात सुस्थितीत राहतात; परंतु हेच द्रव्य पाण्यात प्रमाणाबाहेर विरघळले गेले असल्यास दंतवल्कामध्ये
(एनॅमलमध्ये) विविध रंगांचे डाग पडलेले आढळतात. या दंतविकृतीला 'डेंटल ल्युओरोसिस' असे म्हणतात. पिण्याच्या पाण्यात दर लिटरमध्ये
०.७ ते १.२ मिग्रॅ. या मर्यादांत फ्ल्युओराइडे असलेच पाहिजे अशी दंतवैद्यांची शिफारस
आहे. ल्युओराइडाचे प्रमाण वसाहतीतील हवेच्या दैनंदिन उच्चतम तापमानाच्या वार्षिक सरासरीवर अवलंबून असते. ज्या पिण्याच्या पाण्यात ०.६ मिग्रॅ./लि. यापेक्ष कमी प्रमाणात फ्ल्युओराइड असेल ते पाणी कमी प्रतीचे, तर ज्या पाण्यात १.७ मिग्रॅ./लि. यापेक्षा अधिक फ्ल्युओराइड असेल
ते पाणी दातांच्या दृष्टीने विकृतिकारक समजण्यात येते.
(१०) खनिज व ज्वालाग्राही तेले : शहरांतून किंवा निरनिराळ्या प्रकारच्या औद्योगिक प्रकल्पांतून निघालेली
अपशिष्टे बुद्धिपुरस्सर पाण्यात सोडल्यामुळे भौतिक, जैव व रासायनिक घटकांकरवी प्रदूषण कसे निर्माण होते ते वर नमूद केले आहे; पण कधीकधी अनपेक्षितपणे समुद्रपृष्ठावर काही अपघात घडून येतात. त्यामुळे
विस्तृत प्रमाणावर जलीय प्रदूषण उद्भवते. महासागरांवर अनेक जहाजे परिभ्रमण करीत
असतात. खनिज व ज्वालाग्राही तेलांची आंतरराष्ट्रीय वाहतूक जहाजांद्वारेच करतात. अनेकदा त्यांतील तेलाच्या टाक्या फुटतात व तेल
समुद्रपृष्ठावर पसरते. काही वेळा वजन कमी करण्यासाठीही जहाजातून अनेक टन तेल
समुदात सोडले जाते. वाऱ्यांच्या व लाटांच्या समवेत हे तेल किनाऱ्याकडे वाहत येते
त्यामुळे अगणित पक्षी, मासे, जलचर प्राणी मृत्युमुखी पडतात व सागरी वनस्पतिसंपदा नष्ट होते. समुद्रकिनाऱ्यावर उभारलेल्या खनिज तेलाचे परिष्करण करणाऱ्या (घटक अलग करणाऱ्या व ते शुद्ध करण्याऱ्या) कारखान्यांतून, विहिरींतून व साठवणीच्या टाक्यांतूनही काही प्रमाणात तेल सारखे गळत वा पाझरत
अससे. शेवटी तेही समुद्रात प्रवेश करते. अशा दुर्घटनामुळे अनेक प्रकारच्या खाद्य
माशांना धोका निर्माण होऊन ते बहुसंख्येने नामशेष होतात व अन्नसमस्या गंभीर स्वरूप
धारण करते. तेल परिष्करणाच्या कारखान्याच्या परिसरात जलीय कवचधारी जीवांची निपज
होऊ शकत नाही. कच्चे खनिज तेल, पेट्रोल, रॉकेल, डांबर इत्यादींसारखे पदार्थ साठवणीच्या टाक्या
स्वच्छ करताना अभावितपणे समुद्रकिनाऱ्यालगतच्या पाण्यात सरळ सोडून दिले जातात.
त्यामुळे क्रिओसोल व फिनॉल यांसारखी विषारी द्रव्ये पाण्यात मिसळतात आणि प्रचंड
प्रमाणावर मत्स्यसंहार घडवून आणतात. समुद्रपृष्ठावर तेल पसरल्यामुळे लगतच्या
पाण्याच्या थरांना सौर प्रारण कमी प्रमाणात मिळते. त्यामुळे सागरी पाणी आणि वातावरण
यांच्यात घडणाऱ्या ऑक्सिजन-विनिमयची त्वरा मंद होते. खनिज
तेल रसायने माशांच्या पोटात गेल्यास त्यांच्या मांसाचा व त्वचेचा रंग बदलतो आणि ते
सेवनास अयोग्य होतात.
मोठे तेलवाहू जहाज फुटल्याने व त्यातील तेल सागरी
पृष्ठावर पसरल्याने विस्तृत प्रमाणावर जलीय प्रदूषण निर्माण झाल्याची घटना 'टॉरी कॅन्यन' या जहाजाबाबत १८ मार्च १९६७ रोजी घडून आली. हे जहाज कुवेतमधील १,१८,००० टन कच्चे तेल घेऊन इंग्लंडच्या जवळपास येत
असताना त्यावर गैरसमजुतीने बाँबहल्ला झाला व ते सेव्हन स्टोन्स रीफजवळ आले असताना
जमिनीत रूतून बसले. त्यातील तेलाच्या सहा टाक्या फुटल्या व ६०,००० टन तेल जहाजाच्या दक्षिणेस सु. १३ किमी.पर्यंतच्या समुद्रपृष्ठावर पसरू
लागले. २५ मार्च १९६७ नंतर हे तेल समुदकिनाऱ्याजवळ येऊ लागले व अनेक आठवडे ते
किनाऱ्याकडे येतच होते. प्रक्षालके वापरून समुद्रकिनारा वारंवार
स्वच्छ करावा लागत होता. कॉर्निश किनारपट्टीच्या सु. १६० किमी. लांबीच्या
किनाऱ्यांवर तेल पसरलेले होते. सिली बेटांमधील सेंट अॅग्नस येथील पक्षिवेधशाळेने
४०,००० सागरी पक्षी या दुर्घटनेत मेल्याचे प्रसिद्ध केले, तर तेल सांडल्यामुळे प्रदूषित व घाणेरड्या झालेल्या किनाऱ्याकडे पर्यटक कित्येक दिवस न फिरकल्यामुळे
शासनाला लक्षावधी पौंडांचे नुकसान सोसावे लागले, असे ब्रिटिश शासनाने प्रसिद्ध केले. किनारा स्वच्छ
करण्यासाठी आणि तेल घालविण्यासाठी उपयोगात आणलेल्या रसायनांमुळेच सागरी पक्ष्यांची
अधिक हानी झाली, असे नंतर अधिकृपणे सांगण्यात आले.
तैल-प्रदूषणामुळे ईशान्य अॅटलांटिक मध्ये १९७० साली ३,८०,००० तर १९७१ साली १२,००,००० सागरी पक्षी मृत्युमुखी पडले. अशा
प्रदूषणाचे प्रसंग 'टॉरी कॅन्यन' शिवाय अनेक घडले आहेत आणि भविष्यातही तशाच अनेक दुर्घटना घडू शकतील. त्यांतून
उद्भवणाऱ्या तैल-प्रदूषणाच्या समस्येवर काय उपाय योजायचे, याचा दूरदर्शीपणे विचार करणे अगत्याचे आहे. (संदर्भ-मराठी विश्वकोश)